जलसंपदा विभागाच्या सचिवांच्या नियुक्तीवरून मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाकडे म्हणजेच शरद पवार यांच्याकडे स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केल्याचे खात्रिलायकरित्या समजते. ‘जलसंपदा विभागाच्या कामात घाईगडबडीत निर्णय घ्यायला लावू नका,’ असे मत मुख्यमंत्री ठाकरे यांनी शरद पवारांकडे व्यक्त केल्याचे समजते. तर, मुख्यमंत्र्यांच्या एकूणच कारभाराविषयी राष्ट्रवादीकडूनही नाराजी व्यक्त केली जात असून,प्रशासनाला हाताशी धरून मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसला संपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही केला जात आहे. त्यामुळे एकूणच मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे.
राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार येण्यापूर्वी आधीच्या आघाडी सरकारमध्ये जलसंपदा विभागातील भ्रष्टाचारावरून राज्य सरकारची मोठ्या प्रमाणावर बदनामी झाली होती. राज्य सरकारला पायउतार होण्याच्या महत्वाच्या कारणांमध्ये या कारणाचा समावेश होता. अशा वेळी आपल्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या काळात, तसेच आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात असे भ्रष्टाचाराचे, गैरव्यवहराचे शिंतोडे सरकारवर उडू नयेत यासाठी मुख्यमंत्री खबरदारी घेत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने जलसंपदा खात्यातील प्रकल्पांना गती देण्यावरून, तसेच मुख्य सचिवांवरून मंत्रिमंडळ बैठकीत आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी प्रवीण परदेशी यांची नेमणूक करावी, अशीही राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी असल्याचे समजते. सरकार अंतर्गत सुरू असलेल्या या घडामोडींमुळे मुख्यमंत्री प्रचंड अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी ही नाराजी मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांशीही बोलून दाखवली. एवढेच नव्हे; तर त्यांनी ही नाराजी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाकडेही बोलावून दाखविल्याचे कळते. यावर शरद पवार यांची भूमिका काय आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.
‘राष्ट्रवादीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न’
दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या या नाराजीवर राष्ट्रवादी काँग्रेसनेही पलटवार केल्याचे समजते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीप्रमाणे प्रशासनाला हाताशी धरून राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करू पाहत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री खासगीत सांगत आहेत. अन्न व नागरी पुवठा विभागातील एका बदलीबाबतची फाईल गेले सहा महिने मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे प्रलंबित आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्वत: मुख्यमंत्री ठाकरे यांना अनेकदा आठवण करूनही खात्यातील बदलीबाबतच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरीच केली नसल्याचे कळते. त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांची ही नाराजी पक्षाच्या नेतृत्वाकडे, तसेच मुख्यमंत्र्यांकडे पोहोचविण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे समजते. यापूर्वी आघाडी सरकारच्या दीड वर्षाच्या कार्यकाळात थोड्या कुरबुरी, नाराजीनाट्य पाहायला मिळाले आहे. मात्र, आता पहिल्यांदाच राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जलसंपदा विभागाच्या निमित्ताने ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे.
पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…
पंढरपूर : प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
पंढरपूर | प्रतिनिधी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे मंगळवार, दि. १०…
तंत्रज्ञानाच्या कुंभमेळ्यात कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांचे यश नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय तंत्रज्ञान व प्रकल्प प्रदर्शनामध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट…
वसंत देशमुख-प्रमोद देशमुख यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष मागील महिन्यात पार पडलेल्या सोलापूर जिल्हा परिषद -तालुका…
इंटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्टूडेंट स्पोर्ट असोसिएट यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेमध्ये कर्मयोगी…